महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मृद व जलसंधारण विभाग भरती 2025 अंतर्गत तब्बल 8667 रिक्त पदांची भरती लवकरच सुरू होणार आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी 14 जुलै रोजी विधान परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेनंतर ही भरती आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
मृद व जलसंधारण विभागाचा इतिहास
1992 साली तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी मृद व जलसंधारण विभागाची संकल्पना मांडली होती. मात्र, या विभागाला खरी गती 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मिळाली. त्या काळात विभागासाठी तब्बल 16,423 पदांचा आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु तांत्रिक कारणांमुळे सर्व पदे मंजूर होऊ शकली नव्हती.
जलसंधारण विभागातील 8667 नवीन पदांना मंजुरी
सध्याच्या परिस्थितीला अनुसरून विभागाने नवीन आकृतीबंध तयार केला आहे. त्यामध्ये अनावश्यक पदे कमी करून आवश्यक असलेल्या 8667 पदांना उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. आता लवकरच Maharashtra Government Jobs अंतर्गत या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
भरतीमुळे विभागाची कार्यक्षमता वाढणार
संजय राठोड यांनी सांगितले की, या भरतीमुळे विभागातील विविध कामांना गती मिळेल. विशेषतः, सिंचन व्यवस्थेचा विकास होईल आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांनी स्पष्ट केले की, विभागातील अनेक योजना विविध कारणांमुळे रखडल्या होत्या—काही योजना वनजमिनीशी संबंधित तर काहींना लोकांचा विरोध होता. आता सर्व योजनांचा पुनरावलोकन करून गरजेच्या योजनांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी लाभदायक पाऊल
या मोठ्या भरतीमुळे ग्रामीण भागातील पाणलोट विकास, सिंचन क्षमता वाढवणे, तसेच जमिनीचे संरक्षण यासारख्या योजनांना गती मिळणार आहे. परिणामी, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.