
महाराष्ट्र हवामान अपडेट : शेतकऱ्यांसाठी उत्साहवर्धक बातमी आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 20 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आठवड्यात राज्याच्या विविध भागांत वरुणराजा आपल्या अस्तित्वाची नोंद करणार आहे.
मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची हजेरी लागणार आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसंच, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही पावसाचा जोर कायम राहील, असे डख यांनी सांगितले आहे.
हवामान अंदाजानुसार महत्त्वाचे मुद्दे :
– पाऊस दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये बदलत राहणार.
– ओढे, नाले, आणि नद्यांमध्ये पूर येईल इतका पाऊस पडेल.
– धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
– जनतेने योग्य ती खबरदारी घ्यावी.
– हवामान अंदाजानुसार, वेळ आणि ठिकाण बदलू शकते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस थांबला होता, पण आता तो पुन्हा दमदार स्वरूपात परतला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये पावसाचे पुनरागमन
राज्यात सध्या हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. काही ठिकाणी सतत पाऊस कोसळत आहे, तर काही ठिकाणी कडक ऊन पडत आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये, गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला होता, मात्र आता तो पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत जोरदार पाऊस झाला असून, पुढील काही दिवसांसाठीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकरी बांधवांसाठी हा पाऊस दिलासा देणारा आहे. या पावसामुळे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली नमी मिळणार आहे. तसेच, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पण नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.